Wednesday, December 29, 2010

अक्षता


..................................सद्गुरुसारखा असता पाठीराखा.............................

=============== अवी ===========================

किती दिवसांनी मी आज गावाला जात होतो. किती बर झाले असतील दिवस ? १० वर्ष सहज, कदाचित जास्तसुद्धा असतील. मुंबईला आल्यापासुन वेळच मिळाला नव्हता. १० वी गावाला झाल्यावर जो मी मुंबईला गेलो तो आज उगवत होतो. गाव तसच होत. बदललेलच नव्हत. बदलण्यासारख त्या गावी काही नव्हतच म्हणा. नाही म्हणायला काही मोठी माणास म्हातारी झाली होती आणि काही म्हातारी गचकली होती.

काही घरांची डागडुजी झाली होती तर काही ओसाड झाली होती.

महाद्याचा बाप मशेरी लावत बाहेर बसला होता. मला पहाताच तसाच मशेरीच्या हातानी आणि तोंडानीच बाहेर आला.

"कधी आलास ?"

आता माझ्या हातात बॅग, मळलेला आणि दमलेला चेहरा, गावात काय बदललय हे जाणुन घेणारी नजर, सर्व सांगत होत की मी आत्ताच आलोय.
मी फ़क्त हासलो. तस त्याला सुद्धा माझ्या उत्तराची आपेक्षा नव्हतीच. मी तसाच काकाच्या घरात शिरलो.

"काका" हाक मारली.

झोपलेल्या काकानी कुस बदलली.

"आलास ? बस "

माझ स्वागत संपल. काकुनीच विचारपुस केली, चहा पाणी दिल. जेवणाला आवकाश होता. जरा गावात फ़ेर फ़टका मारला. बर वाटल. जेवण काय असेल याचाच विचार करत घरी आलो, मटणाची सागुती आणि भात. वा ! गावच्या मटणाची आणि काकुच्या स्वयंपाकची चवच काही और होती. जेवण झाल्यावर मस्त झोप लागली. जाग आली तीच संध्याकाळी. आकाशात थोडे ढग होतेच. संधीप्रकाश पडला होता. अस आकाश तांबड झाल की आमचा गाव फ़ारच छान दिसतो. तांबड्या मुरमाचे रस्ते, घरांची कौल तांबडी, आणि त्यावर हा तांबडा रंग. मला अशा वेळी बाहेर फ़िरायला खुप आवडत. मी काकुला

"बाहेर जातो ग !"

अस सांगुन रस्त्यावर आलो. लांब लांब पावल टाकत चाललो होतो. माझ्याच धुंदीत होतो मी. किती वेळ चाललो काय माहिती. गावाच्या बाहेर आलो होतो.सूर्य अस्ताला जात होता. गावाला सुर्यास्त झाला की लगेच काळोख होतो. थोड्याच वेळात काळोख झाला आणि मी भानावर आलो. कुठे होतो मी ? आधी मी आहे कुठे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आतापर्यंत मंबईच्या दिव्यांना सरावलेल्या डोळयांना हळु हळु या अंधाराची सवय झाली.

मी सभोवार नजर फ़िरवली आणि मी कुठे आहे याचा मला हळु हळु अंदाज आला. वडारवाडी केव्हाच ओलांडुन मी पुढे आलो होतो. भिमाच खाचर सुद्धा मागे पडल होत. मग आता मी नक्की कुठे आहे ? आणि अचानक मला लक्षात आल, मी नानाच्या टेकाडावर होतो. नानाचा वाडा इथुन जवळच होता. आता वाडा असेल का ? नाना जिता असेल का ? नानाची मुलगी काय बर नाव तीच ? हं अक्षता, किती दिवसांनी आठवल नाव. अक्षताचा रंग फ़टफ़टीत गोरा, डोळे घारे आणि बटबटीत, नाक चपटच, दात पुढे. पण अक्षता स्वतः व नाना तिला फ़ार सुंदर समजत होते. नानाची बायको कधीच मेली होती. नानानी दुसर लग्न केल नाही. मुलीला सांभाळलं. मुलगी तशी अभ्यासात हुशार होती. नाना शेती सांभाळायचा व गावात पुजा पाठ करायचा. त्याला लिहिता वाचता येतच नव्हत. मंत्र खरच किती येत होते ते त्याला व त्या एका ईश्वरालाच माहिती. पण त्याला लोक बोलवायचे. तांदुळ व थोडे पैसे द्यायचे. नाही म्हणायला सार्वजनिक पुजेला नाना बरीच कमाई करायचा.

नाना मला घरी बोलावून बोलावून थकला. मी कधीच त्याच्या घरी गेलो नव्हतो. आता इतक्या रात्री त्याच्या घरी जायच का ? नाना तर कधीच झोपला असेल. गेलो त्याच्या घरी तर तो मला ओळखेल का ? अक्षता इथे असेल का लग्न होऊन कुठे सासरी गेली असेल ?

हा विचार करतो न करतो तर समोरुन रस्त्यावरुन कोणीतरी येताना दिसल. खर तर या रात्री कोणीही झपाझप पावल टाकत येईल पण मला उगाचच समोरुन येणार्‍या आकृतीला बघुन या व्यक्तीला काही घाई नाही अस वाटल.

जवळ आल्यावर लक्षात आल की, ती एक बाई आहे. आणखीन जवळ आल्यावर पाहिल की, रंग गोरा होता. या अंधारात सुद्धा चांदण्याच्या प्रकाशात तीचा रंग गोरा आहे हे कळत होत. डोक्यावरुन घेतलेल्या पदरानी तीच तोंड झाकलेल होत. तरीसुद्धा ती एक १७-१८ वर्षांची युवती आहे अस वाटत होत अथवा जाणवत होत. जशी ती युवती जवळ येत होती, तसा एका कोणत्यातरी फ़ुलाचा वास यायला लागला. कोणत्या बर फ़ुलाचा हा वास ? लक्षातच येत नाही. हा वास मी लहानपणी खुप अनुभवला आहे.

खरी तर जिवंत बाईच समोर होती पण तरी माझ्या मनाचा थरकाप उडाला. अंधाराचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो पहा. आजवर पाहिलेले हॉरर मुव्ही, वाचलेली भुताटकीची पुस्तकं सर्व आठवल. आपण आपल्या सुरक्षित घरात अथवा अनेक लोकांबरोबर थिएअटरमधे बसुन असे सिनेमा बघण व भुताटकीची पुस्तक वाचुन त्याच्या थ्रिलचा अनुभव घेण वेगळ आणि अशा एकट ठिकाणी असे विचार मनात येण वेगळ.

त्या बाईला पाहिल्यावर काय काय गोष्टी मनात येऊन गेल्या. आपसुक नजर खाली गेली. खरच भुताचे पाय उलटे असतात का? का ही पण एक कल्पना आहे, काय माहिती.

त्या अंधारात मला तीचे पाय दिसलेच नाहीत.

एक थंड लहर मनाचा वेध घेत गेली. अंग शहारल. आता माझ हृदय इतक जोरात धडधडत होत की, माझी धडधड कदाचित त्या बाईला ऎकायला गेली असेल. लांब कुठेतरी एक कुत्र रडलं. या कुत्रांना पण समजत नाही कधी रडायच ते. त्या थंडीतसुद्धा मला धरधरुन घाम फ़ुटला. पहील इंट्युशन पळुन जा. पण मी साधारणपणे इंट्युशनकडे लक्ष देत नाही. मी एक सायन्सचा ग्रॅज्युएट, मला भुताखेतावर विश्वास नसला पाहिजे. या भंपक कल्पना आहेत सगळ्या.

कुठे जात असेल ही मुलगी ? कोणाची असेल ही आणि या वेळी या आडबाजुला एकटीच काय करते ? का माझ्यासारखी ही पण संधीप्रकाशात बाहेर फ़िरायला निघाली होती ? का कोणी इथेच जवळपास नवीन राहायला आलेली आहे ? मी विचार केला आता या युवतीला विचारायचच. मी जवळ गेलो. मला तीचा तोडावरचा पदर मागे करायचा मोह झाला. माझ दूसर मन मला मागे खेचत होत.

हे माझ दूसर मन आहे हे फ़ार वाईट आहे. मी काहीही करायला लागलो तर लगेच मला मागे खेचत. अर्थात बहुतेक वेळा त्याचच बरोबर असत. यावेळी मात्र मला मोह अनावर झाला. मी दोन्ही हात वर नेले, पदराच्या दिशेनी. पण मनावर असलेले संस्कार आड आले. मन सारख नकोच म्हणत होत. मी हात खाली घेतले.

मला उगाचच वाटल की त्या युवतीला खुप राग आलाय. मला परत परत तोच मोह होत होता. खर तर मी अतिशय सुसंस्कारीत , नीतीमान व देवाधर्माच करणारा आहे. असे विचारसुद्धा माझ्या मनात यायला नकोत.

मी त्या मुलीला विचारल "तू कुठे राहातेस ?" तीनी नानाच्या घराकडे बोट दाखवल.

"नानाच्या घरी ? "

तीनी होकारार्थी मान हालवली. असेल नानाची कोणी नातलग. मी विचारल

"नाना आहे का घरी ?"

तीनी नकारार्थी मान हालवली.

"आणि अक्षता ?"

मला तिने कोणतच उत्तर दिल नाही.

"या माझ्याबरोबर" पहिल्यांदा ती बोलली. आवाज चांगलाच होता. कुठे तरी ऎकलेला होता. पण फ़ार लांबुन आलेला वाटला. कुठे बर हा आवाज ऎकलाय ? आठवत नव्हत. परत माझ दूसर मन म्हणाल जाऊ नको तीच्या मागे पळुन जा.

पण मी यावेळी ठरवल नाही ऎकायच या दूसर्‍या मनाच. मी पुढे सरसावलो.........

तरीसुद्धा माझ मन मला मागेच खेचत होत. मी जरा घुटमळालो. ती परत म्हणाली

"या माझ्या मागे"

आणि काय झाल मला समजलच नाही. मी सरळ तीच्या मागे मागे चालायला लागलो. आजुबाजुची झाड, आजुबाजुचे आवाज मला काहीच ऎकायला येत नव्हते. तोच एक ओळखीचा वास. तोच मन बधीर करत होता. कोणता बर हा वास ? हो आता आठवल, हीच फ़ुलं अक्षता डोक्यात घालायची. हो तोच तो वास. आता तो वास माझ्या डोक्यात भिनत गेला. मन पार बधीर झाल. किती वेळ मी चालत होतो माहिती नाही. मन कुठे तरी आत खोल खोल जात होत

......विचार संपत होते.....विचार एकच, समोर आहे त्या तरुणीमागे चालत राहायच.

कोण होती ही तरुणी ? आणि अचानक जाणवल ही अक्षता. हो हॊ अक्षता.

मी हाक मारली

"अक्षता"

आणि ती तरुणी झटकन वळली. एक भयानक भितीची लहर डोक्यापासून पायापर्यंत धावत गेली.

अक्षता हासायला लागली. या क्षणाचीच जणु काही ती वाट पाहत होती. फ़ुलांचा वास आणखीन प्रखर झाला. मी अक्षताच्या दिशेनी पुढे सरकलो. हासत हासत अक्षता जागीच थांबली. मी पुढे झालो आणि तीच्या तोंडावरचा पदर मागे केला. थोडासाच मागे झाला. अक्षता खुप मोठ्यानी हासायला लागली व मागे झाली. आता माझ्यानी थांबण शक्यच नव्हत. मी यंत्रवत पुढे सरकलो.

अक्षता मागे झाली. माझ्या हातीच लागेना. मी किती वेळ तीच्या मागे चालत होतो. वास आणखीनच प्रखर झाला. आता तर वासाशिवाय कोणतीच संवेदना शिल्लक नव्हती......

मन आत आत जात होत.......

झोपेतुन जाग होताना जो अनुभव येतो तोच येत होता आणि अचानक काय झाल समजलच नाही.

पाय एका दगडाला अडखळला व मी अचानक भानावर आलो. समोरच दृष्य भयानक होत. मी विहिरीच्या जवळ होतो. एक पाऊल पुढे व मी आत पडलो असतो.
अक्षता विहिरीच्या मधोमध अधांतरी उभी होती व मला बोलवत होती.

मी तसाच मागे फ़िरलो व धावत सुट्लो. मला अक्षताचा मागे बोलवण्याचा आवाज येत होता. घराच्या दरवाजात नाना उभा होता तोसुद्धा मला बोलवत होता, पण मी आता न थांबता धावत सुटलो.

कस बस नानाच टेकाड पार केल. आणि मागे येणार्‍या अक्षताचा आवाज कमी झाला. मला थांबायच नव्हत मी तसाच धावत धावत पार गावात शिरलो.

मध्यरात्र कधीच उलटली होती.

माझी वाट पाहुन हैराण झालेला काका व शेजारी, शोधा शोध करायला निघतच होते, व मी पोहोचलो. मला पाहाताच काकाचा जीव भांड्यात पडला. मी काकाला मिठी मारली. सगळे मला विचारत होते की

" काय झाल ? कुठे होतास ?धावत का आलास ? इतका का घाबरलेला दिसतोस ?"

पण मला इतकी धाप लागली होती की बोलताच येत नव्हत. थोड पाणी प्यायल्यावर मी काकाला सगळ सांगितल. काकाच्या व इतर लोकांच्या पांढर्‍या फ़टक पडलेल्य़ा चेहर्‍यावरुन मला काहीच उलगडा होत नव्हता. काकानी मला देवघरात नेल. देवाच्या पाया पडलो. म्हणाला

"राम राया वाचवलस रे माझ्या लेकराला तू"

गावकर्‍यांना म्हणाला उद्या सत्यनारायणाची पुजा करतो. मला म्हणाला

"अक्षता मरुन १० वर्ष झाली. तीनी त्या विहीरीत उडी मारुन जीव दिला आणि नंतर नानानी पण त्याच विहिरीत उडी मारली, त्या रस्त्यानी उशीरा येणारे अनेक लोकं गायब झाले आहेत."

ऎकल व अंगावर काटा आला. काका व गावातली माणसं बरच सांगत होते. कोणाकोणाला काय काय अनुभव आलेत ते सर्व सांगत होते. पण अक्षताला व नानाला पाहुन परत आलेला मात्र मीच एकटा होतो. प्रचंड दमलो होतो. खुप झोप आलेली होती. जाऊन झोपलो. डोळ्यासमोरुन अक्षता जात नव्हती.

.............मी एका रस्त्यावर उभा होतो. रस्त्यावर कोणीच नव्हत. एकही आवाज येत नव्हता. कोणता रस्ता आहे, अंदाजच येत नव्हता. रस्त्यावरुन घुळ उडत होती. कोणतीही गाडी आल्याच चिन्ह नव्हत. मी उभा होतो ती जागा थोडी उंचावर होती. रस्ता त्या जागेपासून खाली उतरुन जात होता. धुळीचा एक लोळ खालून वर त्या रस्त्यावरुन येत होता, माझ्याच दिशेनी. तो लोळ माझ्या समोर येऊन थांबला. आणि हळू हळू धुळीचे कण एकत्र व्हायला लागले. एक आकृती तयार होत होती. बघता बघता त्या आकृतीनी मानव सदृश आकार घ्यायला सुरवात केली. आणि आता तर ती आकृती एका बाईची आहे हे जाणवायला लागल. मला प्रचंड भिती वाटत होती. पळून जावस वाटत होतं. पण शरीर एकाच जागी चिकटल्यासारख उभ होतं. हालचाल होत नव्हती. आता ती बाईची आकृती जवळ आली आणि मला दिसल, ती अक्षता आहे. एक भितीची लहर पायापासून डोक्यापर्यंत गेली. तोच ओळखीचा वास भसकन नाकात गेला आणि थरकाप भिती वाटायला लागली. अक्षता मला बोलवत होती. मी "नको नको" अस ओरडायचा प्रयत्न केला. पण तोंडातुन शब्दच फ़ुटत नव्हता. खूप जोरात ओरडायचा प्रयत्न केला.....

"अरे काय झाल ? जागा हो, जागा हो......स्वप्न पडल का ? " काका काकू मला गदागदा हालवून जाग करत होते. मी मोठयामोठ्यानी ओरडतच जागा झालो.

याच वा अशाच स्वप्नांनी पुढचे दोन दिवस ओरडत उठलो. पण नंतर मात्र मला गावाला राहायची भितीच वाटायला लागली. मी सरळ गाडीत बसलो आणि मुंबईला आलो. खुप बर वाटल. सुट्टीचे २ दिवस बाकी होते. निलेशला माझ्या मित्राला फ़ोन केला. निलेश माझा गावातल्या शाळेपासूनचा वर्ग मित्र. अनेक वर्ष आम्ही बरोबर होतो. एकाच बाकावर बसायचो. अभ्यास बरोबरच केला. कॉलेज एकच. त्यामुळे आमच नात सख्या भावासारख होत.

निलेशनी रात्री त्याच्याच घरी बोलावल. मला पण एकट झोपायची भितीच वाटत होती.

निलेशकडे गेलो आणि त्याला गावातला सर्व प्रकार सांगितला. त्याला आधी अक्षता आठवतच नव्हती. पण नानांची मुलगी म्हण्ल्यावर लगेच आठवली.

आधी निलेशनी माझ्या फ़िरक्या घेतल्या. पण मग सिरिअस झाला.

निलेश म्हणाला

"
अवी, अरे आपण एक एक पेग घेऊ आणि झोपुन जाऊ. तू भूत वगैरे सर्व विसरशील."

निलेशनी रमची बाटली काढली व एक एक घोट घेत चवीनी मी सांगत असलेली घटना ऎकत होता. जस काही एखाद भुताच पुस्तक वाचतोय अस. मधेच हासत होता. मला खुप त्याचा राग येत होता पण काय करणार ? मला आत्ता कोणाच्या तरी आधाराची गरज होती. आणि निलेश माझा जिवलग मित्र होता.

"
अवी, मला एक सांग रे, काकाशी तू तुझ्या शेताबद्दल व घराबद्दल बोललास का ?"

"
नाही रे, या प्रकारानंतर मी काही बोलायच्या मनःस्थितीतच नव्हतो. आणि तसही मी शेत व घर काकालाच देणार आहे. का रे अस विचारतोस ?"

"
ते ठिक आहे रे. मी सहज विचारल. त्या कामासाठी गेला होतास न "

"
हो पण पहिल्याच दिवशी असा अनुभव आल्यावर पुढे काहीच करायची इच्छाच उरली नाही"

काहीच न बोलता मला त्यानी झोपायला सांगितल. मला खुप झोप आलेलीच होती. २ दिवस नीट झोपलेलो नव्हतो. मी पण पडत्या फ़ळाची आज्ञा मानुन लगेच झोपुन गेलो. निलेश पुस्तक वाचत बाजुलाच टेबलावर बसलेला होता.

कधी झॊप लागली समजलच नाही.

.............. हे काय होतय ? समोर काय आहे हे ? ही एक विहीर आहे. हो नक्कीच विहीर आहे. मी कुठेतरी पाहिलेली आहे. त्या विहिरीच पाणी हलायला लागल. काय होतय हे ? अस वाटतय की कोणीतरी वर येतय. कोण आहे ? डोक वर आल, आता हळू हळू बाकी शरीर वर येत चालल. आणि मी ओळखल ती अक्षता होती. हळू हळू वर येत होती. मी मागे फ़िरलो. वाट फ़ुटेल तीथे धावत सुटलो. मला जाणावत होत. कोणीतरी पाठलाग करतय. माझी खात्री होती ती अक्षताच होती. धावता धावता मला नानाच टेकाड दिसायला लागल. मी जोरात धावत होतो. आणि समोर अचानक अक्षता आली. माझ्या अंगातला सर्व जोरच निघुन गेला. अक्षता जवळ येत होती. मी मदतीसाठी ओरडत होतो. अक्षता जवळ यायला लागली आणि मी खुप मोठ्यानी ओरडलो......................................



=============== निलेश ================

शेवटचा पेग संपवला. हातातल पुस्तक बाजूला ठेवल. आता झोपायलाच जाणार होतो. सहज लक्ष बाजूला झोपलेल्या अवीकडे गेल. त्याचा चेहरा खुप आक्रसलेला दिसत होता. कसल स्वप्न बघत होता काय माहिती ? गावाला गेला आणि अक्षताला पाहिल म्हणतोय. गावाकडची लोक मोठी इरसाल. या लोकांनी याची मस्त फ़िरकी घेतलेली दिसते. आता गेलो गावाकडे की सांगतील याची फ़जिती रंगवुन. त्यात ही अक्षता, नाना, अवीचा काका सर्व असतील. याचा काका तर मोठा हरामी माणूस. कमीत कमी बोलुन समोरच्याची जास्तीत जास्त फ़िरकी कशी घ्यायची हे त्याच्या कडून शिकाव.

अवीची गावाला बरिच जमीन आहे. त्याचा काकाच ती बघतोय. बहुतेक अवीला घाबरवुन जमिन हडपण्याचा प्रकार दिसतोय. हल्ली हा प्रकार सर्रास वापरला जातो. शहराच्या उजेडाला सरावलेली माणस, गावाकडच्या मिट्ट काळोखाला आधीच घाबरलेली असतात. त्यात त्यांना भुताच्या, चोरांच्या वा दरोडेखोरांच्या गोष्टी सांगुन घाबरवल जात. सोबत साप, विंचू ही भिती असतेच. शहरी बाबूंना पिडायच व शहरात पिटाळुन लावायच.

गावाला प्रत्येक विहिरीत, प्रत्येक वडा पिंपळाच्या झाडावर एक भुत असतच. गावातली लोकं त्या भुतांबद्दलच्या कहाण्या रंगवुन सांगतात. त्यातलाच हा प्रकार असणार. आणि हा बावळट त्याला फ़सलाय.

जाऊ दे झोपेल जरा शांत. २ दिवस ठेऊन घेतो. मग विसरेल त्याच्या त्या अक्षताला आणि लागेल कामाला. चला आता झोपाव असा विचार करुन मी उठलो आणि माझ्या बेडरुममधे गेलो. आता झोपणार तर अवीच्या मोठ्यानी ओरडण्याचा आवाज आला. धावतच त्याच्या खोलीत गेलॊ तर हा मोठ्यानी ओरडत होता. जागाच होत नव्हता. घामानी निथळत होता.

"अरे उठ काय झाल ? का ओरडतोयस ? " मी अवीला हालवुन जाग केल.

अवी जागा झाला तरी एका कोपर्‍यात बघत होता. मला स्वप्न सांगत होता. आणि भितीनी थरथरत होता. मला म्हणाला

"
निलेश, बघ त्या कोपर्‍यात" मी पाहिल त्या कोपर्‍यात पाणी साचलेल होत.

"
अरे मघाशी दारु पिताना आपल्या हातुन सांडलेल असेल"

"
नाही निलेश, याच दिशेला अक्षता उभी होती. ती इथे येऊन गेली आहे"

"
काय अवी लहान मुलासारख करतोस ? अरे भुत कधी असत का ? आणि समजा असल तरी अक्षताच भुत गावाला. तू त्या गावापासून दूर मुंबईला आहेस. जस्ट फ़रगेट अक्षता. शांत झोप. "

"
अरे अवी तुला कळात कस नाही ? मला रोज हे स्वप्न पडतय. मी दर स्वप्नात जास्त जास्त त्या विहिरीच्या जवळ जातोय. मला जेव्हा पहिल्यांदा अक्षता दिसली तेव्हा मी नानाच टेकाड पार करु शकलो. आताच्या स्वप्नात मी ते करु नाही शकलो. अक्षतानी माझा मार्ग अडवला."

मी अवीला म्हणालो अवी तू माझ्या बेडरुममधे येऊन झोप. त्या खोलीत भुत येणार नाही. मी त्याला जबरदस्तिनीच घेऊन गेलो आणि माझ्या बेडरुममधे आम्ही झोपलो......रात्री २ वेळा अवी घाबरुन उठला. मग एक पुस्तक वाचत बसला. मला म्हणाला "तू झोप". निदान रात्रभर मला तरी नीट झोप लागली. अवी किती भित्रा आहे ? लहान मुलासारखा घाबरतो. भुत वगैरे असत का ? काही तरी खुळचट कल्पना.

आळोखेपिळोखे देत उठलो. अवी बाजुच्या खुर्चीत झोपला होता. त्याच्याकडे बघत हासत मी बेडरुमच्या बाहेर आलो आणि हादरलोच. दाराबाहेर पाण्याच थारोळ साचल होत. त्यात शेवाळ तरंगत होत. माझ्या अंगावर धरधरुन काटा आला. मॉप घेऊन मी पटापट ते साफ़ केल. पण आता काय करायच हा प्रश्नच होता. मित्राला अश्या स्थितीत सोडता येत नव्हत. ब्रेकफ़ास्ट घेतला. अवी तर एखाद्या कोकरासारखा घाबरलेलाच होता.

मला अचानक आठवला माझा कॉलेजमधला मित्र सोमेश. तो काहीतरी असेच प्रकार सांगत असतो. कोणातरी स्वामींच्या बद्दल बोलत असतो. त्याचे ते गुरु आहेत. त्याच म्हणण की जगातला कोणताही जादु टोणा वा भुत पिशाच्च स्वामीजी सहज दूर करतात. मी तर त्याची खुपच फ़िरकी घेतो. पण आता त्यालाच भेटायला हव. ऑफ़िसला दांडि मारली व अवीला घेऊन सोमेशच्या दुकानावर गेलो. त्याला थोडक्यात हळु आवाजात सांगितल व हे काम स्वामीजी करु शकतील का विचारल. सोमेश म्हणाला

सद्गुरुसारखा असता पाठीराखा । ........

हल्ली हा वेडा असच काही बोलतो.



========== सोमेश ============



घाबरलेला निलेश, त्याच्या जास्त घाबरलेल्या मित्राला अवीला घेऊन आला. हे विषय दुकानात डिस्कस करण्याचे नाहीत पण काहींना साध भान नसत. ते आत येताच निलेश म्हणाला "सोमेश, जरा बोलायच आहे. स्वामीजी कुठे भेटतील ?" मला लगेच प्रकार लक्षात आला. तो तसच पुढे सांगायला लागला. त्यांना गप्प बसायला सांगुन नोकरांना काही सुचना देऊन त्यांना घेऊन घरी आलो. आता अशा कामांसाठी मी आबाकाकांचीच खोली वापरत होतो.

दार लावल व त्यांना बोलत केल. दोघांनी सविस्तर आपला आपला अनुभव सांगितला. मी डोळे मिटले. मनोमन स्वामीजींच स्मरण केल. मनातुन शब्द आले. "आण त्यांना इथे" बस ही आज्ञा पुरेशी होती.. जास्त वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. अवीच्या मते आता त्याला अक्षतानी अडवलेल आहे. उद्या जास्त काही व्हायच्या आधीच कामाला लागल पाहिजे.

बसनी ताबडतोब निघालो. स्वामी अंतरनाथांच्या घरी सर्व प्रथम गेलो.स्वामीजी ध्यान करत होते. थोड्याच वेळात स्वामीजी बाहेर आले. म्हणाले "सोमेश, आत ये. तुझ्या मित्रांनाही आण"

आत गेल्यावर स्वामीजींना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी डोळे मिटले. थोडा विचार केला व अवीला विचारल "तुझी खात्री आहे का ती अक्षता होती " अवी म्हणाला "हो स्वामीजी"

स्वामीजी उठले त्यांनी निलेश व अवीकडुन जागेची संपूर्ण माहिती घेतली व त्यांना म्हणाले मी व सोमेश त्या जागेवर जातो. तुम्ही या घराच्या बाहेर काहीही झाल तरी पडायच नाही. इथे तुम्ही सुरक्षित आहात. तो दिवस मी व स्वामीजी त्यांच्या खोलीत होतो. त्यांनी धुनी पेटवली त्यात काही औषधी वनस्पती टाकल्या. खुप छान वास खोलीत पसरला. स्वामीजी धानमग्न होते. मी फ़क्त त्यांनी दिलेला जप करत होतो.

समोर जळत असलेल्या धुनीतली थोडी राख त्यांनी निलेश व अवीच्या कपाळाला लावली व आम्ही दोघ ४ वाजता निघालो.

स्वामीजींची कार खुप ऎसपैस होती. व स्वामीजी खुप छान चालवत होते. थोड्याच वेळात आम्ही त्या जागेवर पोहोचलो. संध्याकाळ झालेलीच होती. अवीनी वर्णन केलेल नानाच टेकाड शोधायला आम्हाला वेळ लागला नाही. स्वामीजींनी थोड पुढे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. आणि म्हणाले "सोमेश, आता पुढच काम तुला करायच आहे. मनातला जप बंद कर. आणि त्या नानाच्या टेकाडावर जाऊन उभा रहा"

मी निघालो मनात विचार करत होतो, आबाकाकांकडे जायच ठरल्यापासुन हा जप मी करतोय. आता का बर बंद करायला सांगितला असेल ? मला आबाकाका आठवले. आजही त्या आठवणीनी अंगावर शहारे आले. नानाच्या टेकाडावर येताच मला लांब अंतरावर कोणीतरी येतय अस दिसल. येणारी व्यक्ती शांतपणे येत होती. थोडी जाडगेली ही व्यक्ती माझ्याच दिशेनी येत होती. कोण आहे ? त्या अंधारात मला जाणवल हा तर एक पुरुष आहे. अक्षता नाही. मला जरा बर वाटल.

थोड्यावेळात ती व्यक्ती बरीच जवळ आली आणि मी पाहिल ते होते आबाकाका. मी किंचाळलोच. माझ्यासमोरच आबाकाकांचा भयानक मृत्यु मी पाहिलेला होता आणि आता ते आबाकाका साक्षात समोर उभे होते. आबाकाका ओरडले "सोम्या चल माझ्याबरोबर" आबाकाका पुढे चालु लागले. जाव का मागे. मनात आत आत खुप विचारांची आवर्तन येत होती. पण मी इथे का आलोय कशासाठी आलोय हे मात्र समजत नव्हत. हळू हळु मनातले विचार कमी होत गेले. एकच विचार होता. समोर आबाकाका आहेत आणि मला मागे मागे जायच आहे. मन खुप खोल जात होत.

मी त्यांच्यामागे चालायला लागलो. किती चाललो माहिती नाही. एकदम स्वामीजींचा आवाज आला "बस झाल हे नाटक" समोरचे आबाकाका गर्रकन वळले. मी समोर पाहिल आबाकाका विहिरीच्या मध्यावर होते व मी विहिरीच्या जवळ पोहोचलो होतो.

मागे वळलो माझ्या मागे स्वामीजी होते. धावत मी त्यांच्या मागे लपलो. स्वामीजी म्हणाले "जप सुरु कर". आबाकाकांचा चेहरा व आकार बदलत होता. आता त्याजागी एक प्रचंड मोठी काळी आकृती दिसत होती. या आकृतीला आकार तरी होता का ? ती आकृती अनेक आकार बदलत होती. डोळ्याला जे दिसत होत, ते अंतःपटलावर पडत तर होत. पण नेहेमीसारखा मेंदु त्या दृष्याचा अर्थ लावु शकत नव्हत. विचारशक्ती थांबते अस वाटत होत. मन पिरगळुन निघत होत. जप सतत चालू ठेवला. त्यामुळे निदान मन माझ्याच ताब्यात रहात होत आणि शेवटी आवाज आला.

तो आवाज काळीज फ़ाडुन टाकत होता. काचा फ़ुटताना जसा आवाज होतो तसा आणि त्यात मिसळलेले अनेक आवाज. आता अनेक बायका व पुरुष यांचा एकत्र किंचाळ्ण्याचा आवाज आला. ते स्त्री-पुरुष विहिरीतुन बाहेर आले. आणि क्षणात आम्हाला त्यांनी वेढुन टाकल. मी मनातच स्वामींनी सांगितलेला जप करत होतो. स्वामीजींनी डोळे मिटले. खुप शांत चेहरा दिसत होता.

मला म्हणाले की सोमेश मी अ-कार व क्ष-कार मंत्राचा जप करुन सुर्यशक्ती इथे विहिरीत प्रज्वलित करतोय. तुला कदाचित खुप धग लागेल. घाबरु नकोस. जप चालू ठेव तुला काहीच होणार नाही.

स्वामीजी मंत्र म्हणायला लागले आणि भराभर एक एक स्त्री-पुरुष विहिरीत उतरायला लागले. आता ती आकृतीच फ़क्त विहिरीच्या पाण्यावर तरंगत होती. स्वामीजींवर काही काही फ़ेकत होती. थोड्याच वेळात विहिरीतुन वाफ़ यायला लागली. पाणी अटत चालल आणि नंतर प्रेतं जळण्याची प्रचंड दुर्गंधी यायला लागली. काही वेळ हा प्रकार असाच सुरु होता. नंतर विहिर कोरडी दिसायला लागली. आणि त्याच वेळी एक भयानक आकृती आकाशात निघुन गेली.

स्वामीजी खुप थकलेले वाटत होते. माझ्याच आधारानी ते गाडीत आले. थर्मासमधली कॉफ़ी त्यांनी कपांमधे ओतली. एक कप मला दिला व दूसरा तोंडाला लावुन कॉफ़ी संपवली. थकुन ते थोडावेळ सिटवर मान टेकुन बसले.

हळु हळु त्यांचा चेहरा परत पहिल्यासारखा झाला.

माझ्याकडे बघुन हासले. मी विचारल "स्वामीजी, हा काय प्रकार होता ? अवीला अक्षता दिसली आणि मला आबाकाका अस का ?"

स्वामीजी सौम्य हसले. म्हणाले "ही शक्ती फ़ार पुरातन आहे. या शक्तीच नांव आहे "अधिक्षक" जेव्हा देव दानवांनी समुद्रमंथन केल तेव्हा अनेक चित्र विचित्र शक्ती बाहेर आल्या. अधिक्षक त्यातलीच. सर्व शक्ती भराभर वातावरणात मिसळल्या पण ही शक्ती मेरुवर बसुन राहिली. या शक्तीचा मनावर प्रभाव आहे. त्यामुळे देव दानवांना भ्रम व्हायला लागला. तेव्हा सुर्यानी सुर्यशक्ती फ़ेकुन या शक्तीचा प्रभाव कमी केला व तीला वातावरणार मिसळुन टाकल.

आता ही शक्ती कोणा फ़ार मोठ्या मांत्रिकानी जागवलेली असणार. त्यातच त्याचा मृत्यु झाला असणार. कारण या शक्तिचा तो उपयोग करु शकला नाही. ही शक्ती मनावर राज्य करते. इथे येताच अवीच्या मनात अक्षता आली तर तुझ्या मनात या प्रकारचा पूर्व अनुभव म्हणून आबाकाका आले. ही शक्ती जे मनात असेल त्याप्रमाणे आकार धारण करते. याच प्रकारानी तीनी अनेक निरपराध जिवांना इथे आणुन मारलेल आहे. ही शक्ती कधीच संपत नाही. पण आता ती परत इथे येऊ शकणार नाही. आता सर्व मृतात्म्यांना मुक्ती मिळालेली आहे. चल आपण परत जाऊ."

अर्थात आता अक्षता काहीच करु शकणार नाही हे अवीला पटवायला खुप त्रास झाला. शेवटी पटल एकदाच. आता अवी, निलेश परत कामावर जायला लागलेत. माझ दुकान मी छान सांभाळतोय.

स्वामीजींची कृपा आहेच.

------ निरंजन